Posts

Showing posts from 2017

एक अद्वितीय कलाकार - पं. रविशंकर

Image
पं. रविशंकर - एक अद्वितीय कलाकार पं.रविशंकरांना प्रथम केंव्हा ऐकलं हे माझ्या चांगलंच लक्षात आहे. संगीतातील विद्यार्थीदशा एव्हाना सुरु झालेली होती. १९७७ डिसेंबर मध्ये पेरुगेटजवळील मुलांच्या भावेस्कूलच्या प्रांगणात कार्यक्रम झाला होता. रविजींनी प्रथम बिहाग, परमेश्वरी आणि सिंध भैरवी त्यांनी सादर केली होती. त्या कार्यक्रमाला नेहेमीप्रमाणेच भरगच्च गर्दी होती. पं. किशनमहाराज साथीला होते. हा कार्यक्रम लक्षात राहण्याचे अजून एक कारण म्हणजे पं. किशनमहाराजजींचा रुबाब ! पं. रविजींचा आलाप, जोड, झाला, होइपर्यंत पं. किशनमहाराजजी ग्रीनरूममध्येच होते. तबल्यावरील गत सुरु होताना पं. किशनमहाराजजी स्टेजवर दाखल झाले ! वीरासन घातलेले त्यांचे देखणे व्यक्तिमत्व, कपाळावर भला मोठा टीका असा त्यांचा थाट मात्र अजूनही नजरेसमोर आहे. पं. किशनमहाराजजींचे वादन लक्षात रहाण्याएवढी समज नव्हती. पण पं. रविशंकरांच्या वादनाने प्रचंड प्रभावित झालो आणि पुण्या-मुंबईमध्ये झालेले जवळजवळ सर्व कार्यक्रम झपाटून ऐकले. कधी तिकिट काढून, तर कोणाची ओळख काढून, तर कोणाचे शेपूट पकडून. पण प्रत्येकवेळी त्यांच्या वादनातील रंग काही औरच ह...

उपजेचे बादशहा उ. झाकीर हुसेन

Image
उपजेचे बादशहा - उस्ताद झाकीर हुसेन   य़ेत्या ९ मार्च रोजी समस्त तबलावादकांचेच नव्हे तर जगभरातील सर्व संगीत रसिकांचे लाडके सरताज उस्ताद झाकीरभाईंचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मागे वळून पाहता असं लक्षात आलं कि, तबला ऐकायला लागुन आता चाळीसहून अधिक वर्ष लोटली आहेत. यावर खरंतर विश्वास बसत नाही. ४० वर्षांनंतर आजही त्यांचे व्यक्तिमत्व आणि वादन पूर्वी सारखेच तरुण आहे. चिरतारुण्याचा वर घेउन आलेले त्यांचे कर, काळाने कोणत्या अवस्थेत बनवले आहेत याचे जणु संशोधनच व्हायला हवे ! १९७६ साली नूमविमध्ये बीजे मेडिकल आर्टस सर्कलचा कार्यक्रम होता. पं.हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी संगतीसाठी झकीरभाईंना प्रथमच ऐकत होतो. बहुतेक महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल अलीयावरजंग यांच्या मृत्युमुळे, पक्के आठवत नाही, कार्यक्रम होइल कि नाही याविषयी साशंकताच होती. प्रथम हरिजींनी मारवा व नंतर वाचस्पती वाजवला आणि त्यावेळी झाकीरभाइंनी तबल्यावर कमाल केली व रसिकांना जिंकले एवढेच ध्यानात आहे. त्यानंतर झाकीरभाई हजारो वेळा पुण्यात आले पण प्रत्येक वेळा ते आले, त्यांनी वाजवले आणि त्यांनी जिंकले. आज इतक्या वर्षांनंतर त्यां...

कलाकाराची रोजनिशी ....

Image
कलाकाराची रोजनिशी ....           खूप दिवसांनी आपल्या आवडत्या कलाकाराचा कार्यक्रम जाहीर झालेला असतो. रसिकजन प्रवेशिकांसाठी रांगा लावतात. प्रत्यक्ष कार्यक्रमाचा दिवस उजाडतो. कार्यक्रमाचे ठिकाण गजबजून जाते. मंचावर प्रकाशाचा झगमगाट असतो. सुंदर सजावटीने रंगमंच सजवलेला असतो. ध्वनीव्यवस्था उत्तम लागलेली असते. खाण्यापिण्याचे स्टॉलही रसनेची तल्लफ़ पुरी करण्यासाठी सज्ज झालेले असतात. श्रोते कलाकाराची आतुरतेने वाट पहात असतात. कलाकार मंचावर येतात. कार्यक्रम मोठा बहारदार होतो. कलाकाराच्या आविष्काराच्या आठवणीत, धुंदीत सर्व श्रोते आंदाने घरी जातात. सर्व काही छान झालेले असते. श्रोते मंत्रमुग्ध वगैरे होतात, स्वर खूप दिवस कानात रेंगाळतात, आनंदसागरात न्हाउन निघतात, वगैरे वगैरे दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रात छापून येते.           मग दुसरा दिवस उजाडतो. सामान्य रसिकजनांना विशेष फ़रक जाणवत नाही, कारण कालच्या कलाकाराच्या आविष्काराने श्रवणशक्तीची तहान भागलेली असते. नुसत्या खुर्च्या उरलेल्या त्या भकास मांडवामध्ये संय...

संगीतातील सुचणे

संगीतातील सुचणे             सामान्य श्रोत्यांच्या नेहमी एक मनात येतं की या सर्व कलाकारांना गाणं कसं सुचतं? आणि सुचतं म्हणजे नेमकं काय होतं ? गाण्याची मांडणी हा सगळा मनाच्या कल्पनेचा डोलारा असतो, सगळी घोकंपट्टी असते, शास्त्र नियमांच्या चौकटीत गुरुपरंपरेने सिद्ध झालेली आखीव-रेखीव मांडणी असते  कि कसे ? खरं तर हा एवढा मोठा विषय आहे. ही गायक मंडळी एवढे तासन-तास मैफ़ल सादर करतात,रोज नव्या श्रोत्यांसमोर, रोज नव्या ठिकाणी, रोज नवे सादर करायला यांना कसं काय जमतं ? कधी कधी असेही होते कि एखाद्या कलाकाराला त्याच गावात किंवा स्वत:च्या गावात वर्षातून अनेक मैफ़ली पण कराव्या लागतात. पण त्यातले नाविन्य, ताजेपणा, टवटवीतपणा हे कसा काय टिकवतात बुवा असे नेहमीच श्रोत्यांच्या मनात येत असणार त्याचा शोध घ्यायचा यथाशक्ति प्रयत्न.             खरं म्हणलं तर कोणतेही सादरीकरण पूर्ण नवीन असं कधीच नसतं आणि म्हणलं तर रोजच नवीन असतं. संगीत ही अशी एक कला आहे, ज्या कलेला इतर कलांपेक्षा आणखी एक परिमाण ...

पं. निखिल बॅनर्जी

Image
पं. निखिल बॅनर्जी        कलकत्त्याला सवाई गंधर्व महोत्सवासरखाच डोव्हर लेन नावाचा महोत्सव होतो. सुमारे १९८२-८३ साल असेल. त्या महोत्सवात जगद्‌विख्यात सतारिये पद्मभूषण पं. निखिल बॅनर्जी यांनी वाजवलेले एक ध्वनीमुद्रण कानावर आले. भैरव रागाची आलापी आणि अहिर भैरवमधील गत. संगतीला उस्ताद झाकीरभाई. ते एकदा ऐकले आणि नंतर कित्येक दिवस तेच अद्भुत ध्वनीमुद्रण ऐकतच राहिलो. अनेकदा ऐकूनही समाधान होईना. हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे २७ जानेवारीला पं. निखिलदांना जाऊन ३१ वर्ष झाली. निखिलदांच्या बाबतीत थोडसं नाही चिरा, नाही पणती असं झालं आहे असं वाटतं. कुणी नाव घ्यावं, त्यांचा संगीताचा वारसा चालवावा असे शिष्य नाहीत. कुटुंबात दोन मुलीच, त्याही स्वत:च्या वडिलांच्या दैवी संगीताविष्काराच्या वाटेपासून दूरच राहिल्या. हा मनस्वी, आत्ममग्न आणि द्रष्टा कलाकार तसा दुर्दैवीच म्हणायचा. एवढ्या मोठ्या कलाकाराचं असं का झालं माहिती नाही, पण असं काहीसं झालं आहे त्याचं वाईट वाटतं. तसं पाहिलं तर पं. रविशंकर, उ. विलायतखाँ या मागील पिढीतील हे दोन सतारिये म्हणजे जणू दोन ध्रुवच म्हणायला हवेत. एका...